15 Sept 2009

छत्रपति शिवराय - जीवन रहस्य - भाग २ ... !


भारतीय राजांमध्ये ते एक असे एकमेव निराळे राजे आहेत, ज्यांनी सदैव संभाव्य परीणामांचा विचार केला. युद्धाच्या योजना आखताना भूगोलाचा विचार केला. त्यासाठी त्यांनी कोकणपट्टी आणि वरघाटचे नकाशे बनवून घेतले होते. त्यांचे 'हेरखाते आणि भौगोलिक नियोजन' हा त्यांच्या युद्ध नेतृत्वाचा महत्वाचा पैलू आहे. १६४८ मध्ये फत्तेखानाला पराभूत केल्यानंतरही सिंहगड आदिलशाहीला परत करणे ह्या मागे कुशल नियोजन आहे. १६४८ मध्ये शहाजी राजांची सुटका झाल्यावर छोट्याश्या स्वराज्याला खानस्वारी पेलवणार नाही हे त्यांना लगेच उमगले होते. जावळी जिंकल्याशिवाय 'अफझलखान' या प्रश्नाला उत्तर नाही हे त्यांना १६४९-५० लाच उमगले होते. ती संधी राजांना १६५६ ला मिळाली. जावळी मागोमाग त्यांनी पुन्हा सिंहगड काबीज केला आणि आदिलशाहीला उघडउघड आव्हान दिले. १६५९ च्या खानस्वारीपर्यंत जो वेळ राजांना जावळीत मिळाला, त्यावेळात जावळीच्या दुर्गम खोऱ्यात प्रत्येक माणूस - 'हे राज्य टिकले पाहिजे' या त्वेषाने पेटून उठला असला पाहिजे.



खानवधात एक प्रश्न नेहमी विचारला जातो ते म्हणजे दगा कोणी दिला ??? राजांनी की खानाने ??? समजा खान सुरक्षित परतला असता तर पुढच्या भेटीत शिष्टाचार म्हणुन राजांना खानभेटीस त्याच्या गोटात जाणे भाग पडले असते. प्रतापगडाच्या पायथ्याशी आलेला ... नव्हे आणलेला खान परत जिवंत जाणे शक्य नव्हते. ती व्यवस्था शिवरायांनी करून ठेवली होती. खानवधापाठोपाठ त्याच्या फौजेवर बांदल - शिळीमकर यांनी हल्ला चढवणे, वाई तळावर नेताजी पालकरने विध्वंस करणे, मोरोपंतांनी पारघाटावर हल्ला करणे आणि पूर्ण ताकदीनिशी शक्य तितक्या लवकर कोल्हापुर प्रांती धडक मारणे एवढा व्यापक दृष्टिकोन आणि नेमके नियोजन ह्यामागे आहे. अनापेक्षित घाव घालून जग थक्क करता येते पण त्या थक्क अवस्थेतून बाहेर येईस्तोवर शिवराय काही स्थिर कामे करत असतात. ते विजयोस्तव साजरे करत बसत नाहीत. खानवधा पाठोपाठ कोल्हापुर - पन्हाळा जिंकणे, कुडाळ मारून विजापुर प्रांती धडक मारणे आणि पुढच्या १८ दिवसात १२०००च्या फौजेचा पराभव करून लूट मारणे व ती फौजा दुप्पट करण्यात वापरणे, आणि ह्या सर्वातून आदिलशाही सावरेपर्यंत जास्तीत जास्त प्रदेश जिंकणे, हे सैनिकी कौशल्य ... !!!

"स्थायी यश मिळणाऱ्या मोहिमेचा आरंभ म्हणुन अनपेक्षित धक्याला अर्थ असतो पण तो धक्का देऊन थक्क करणे आणि भानावर येण्यापूर्वी स्थिर विजय मिळवणे हा राजकीय वास्तववाद म्हणजे छत्रपति शिवराय ... "

शाहिस्ते खान प्रकरण असो नाहीतर सूरत लूट, शत्रूला प्रत्येक ठिकाणी नवनवीन पद्धतीने थक्क करून त्यांनी आपले कौशल्य पणाला लावले आहे.

२२ हजाराची फौज घेउन आलेला खान, त्यामागोमाग ३२००० फौज घेउन आलेला सिद्दी जोहर, ६०००० च्या आसपास फौज घेउन उतरलेला शाहिस्तेखान ह्या सगळ्यात मराठी राज्य चिरडले गेले होते. पुढे मिर्झाराजा सुद्धा लाखभर फौज घेउन दख्खनेत उतरला. एवढे प्रचंड ओझे राज्यावर असताना , १ तप यातना भोगून, जाळपोळ, नासधूस, नुकसान सहन करूनही जनतेची निष्ठा तसूभर देखील कमी का झाली नाही ??? या लोकांना राजांनी असे काय दिले होते ??? बाजीप्रभु असो नाहीतर शिवा काशिद ... तानाजी असो नाहीतर मुरारबाजी ... ह्या सर्वात एक विलक्षण साम्य आहे. माणसे लढताना मरतात ही लढाई मधली नित्याची बाब आहे. पण जाणीवपूर्वक आपण मरणार याची खात्री असताना, केवळ मरण्यासाठीच लढतात ही अभुपुर्व गोष्ट आहे. ह्या माणसांना मरण्याची प्रेरणा कुठून मिळते ???


अनेक साहसी लढाया आणि पराक्रम ह्याचा अंत पुरंदरच्या तहात झाला. १६ वर्षे खपून जे मिळवले ते एका क्षणात तहात गेले. या तहावरुन समजुन आले की ज्यांच्याविरुद्ध राजे लढत होते ते किती बलाढ्य होते. पुरंदरच्या तहात पूर्ण पराभव होता आणि आपली पुढची लढण्याची किमान शक्ती शाबूत ठेवून राजांनी हा तह पूर्णपणे मान्य देखील केला. या पराभवाचा परिणाम नेताजी पालकर वर झाला आणि त्याने स्वराज्याची साथ सोडली. १६५९ ते १६६५ या काळात जे कणखरपणे लढले ते प्रचंड कसोटयांमधून बाहेर पडले. राजे आग्र्यामध्ये असताना देखील त्यांनी कारभार चोख ठेवला. राजा अटकेत असताना देखील फौजा बंड करत नाहीत आणि जनतेचा विश्वास कमी होत नाही हे महत्वाचे आहे.


आग्र्याहून सुटून आल्यावर शिवरायांनी स्वतः औरंगजेबाला पत्र लिहून तह मोडणार नसल्याचे कळवले होते. १६६७ ते १६६९ ह्या वर्षात उठावाची जोरदार तयारी केली गेली पण गेलेला एकही किल्ला घेण्याचा पर्यंत केला गेला नाही. मात्र १६७० च्या सुरुवातीपासून अवघ्या ५ महिन्यात सर्व किल्ले मराठ्यान्नी जिंकून घेतले. हे अजून एक थक्क काम. १६७१-७१ ह्या काळात तर खानदेश - बागलाण - बुरहाणपुर - जालना - व्हराड ह्या सर्व मोघल भागात छापे घालून लूट मिळवणे आणि अस्थिरता निर्माण करणे हे काम जोमाने सुरू होते. या सर्व घडामोडीसोबत १६५७ पासून आरमाराची उभारणी करून समुद्रावर छापे घालण्याचे तंत्र विकसित करणे, व्यापारी नौका उभारणे, नविन किल्ले उभारणे आणि हाती आलेले किल्ले दुरुस्त करणे असे चौरस उपक्रम सुरू होतेच.
.
.
.
क्रमश: .....

3 comments:

  1. शिवाजी महाराज जसे तुम्हाला समजले तसे आज प्रत्येकाला उमगायला हवेत....
    माहिती पुरवल्या बद्दल धन्यवाद ...
    पुढील कामासाठी शुभेच्छा

    ReplyDelete
  2. धन्यवाद ... खरं तरं इकडे 'छत्रपति शिवाजी' अर्ध्या अधिक लोकांना कळलेला नाही आहे . 'छत्रपति शिवाजी महाराज की जय' आणि 'जय भवानी जय शिवाजी'च्या पुढे ९०% लोकांना माहिती नाही.

    आपल्या जाणत्या राज्याची उपेक्षा आपणच चालवली आहे... :(

    ReplyDelete
  3. Chhatrapati Shivaji Maharajanvishi asha prakarchi mahiti jevha lokanparyant pohchel tevhach khrya arthane lokana ShivajiMaharaj samjtil.

    ReplyDelete