28 Mar 2010

छत्रपति शिवरायांची बलस्थाने ... ४. युद्धतंत्र ... !

मागील भागावरुन पुढे सुरू ...



मराठ्यांचे युद्धतंत्राचे ब्रीद होते - 'मति कुंठित करणारा वेग आणि अक्कल गुंग करणारी चपळाई.' याला दिले गेलेले नाव म्हणजे 'गनिमी कावा'. पण गनिमी कावा म्हणजे नेमके काय??? हे नाव कोणी ठेवले? कसे पडले? म्लेच्छांसाठी गनिम म्हणजे मराठे. तर कावा म्हणजे कपटाने केलेला हल्ला. थोडक्यात शत्रुने आपल्या लढाईच्या पद्धतीला दिलेले हे नाव इतकी ढोबळ माहिती आपल्या सर्वांना असते. पण मराठ्यांचे युद्ध तंत्र इतकेच होते का??? ह्याच तंत्रावर त्यांनी साल्हेरी पराक्रम गाजवला??? दक्षिण दिग्विजय फत्ते केला? पुढे दिल्लीवर कब्जा मिळवला??? उत्तर अर्थात 'नाही' हेच आहे. मराठ्यांचे स्वतःचे असे एक विकसीत तंत्र होते. त्याबद्दल आपण थोड़ी माहिती घेउया पण त्याआधी 'गनिमी कावा' या शब्दाबद्दल थोड़े अधिक जाणून घेउया.

कावा म्हणजे कपट, हुलकावणी असे त्याचे सरळ अर्थ असले तरी त्याचा अजून एक अर्थ आहे तो म्हणजे 'घोड्याची रग जिरवण्यासाठी त्यास वेगाने घ्यावयास लावलेले फेरे'. अधिक स्पष्टपणे सांगायचे तर घोड़ा वेगाने वाटेल तसा वळवणे, फिरवणे आणि मंडल, फेर किंवा घिरटी घेत वेगाने पुढे नेणे. आता ह्या मधून काव्याबद्दल अधिक योग्य माहिती हातात येते. मराठ्यांचे घोड़े हे अश्या प्रकारच्या तंत्रात तरबेज केलेले होते. वेग कमी करून घोड़ा हवा त्या दिशेला वळवणे कोणालाही जमेल पण वेग कमी न करता घोड़ा हव्या त्या दिशेला वळवणे हे कठीण काम असते. कारण वेग मंदावून मोहरा बदलल्यास शत्रूला आपली पुढची चाल सहज समजू शकते तेंव्हा घोडेस्वार कोणत्या दिशेला वळणार आहे ह्याचा अंदाज शत्रूला बांधू न देता मोहरा बदलणे अतिशय महत्वाचे असते. अश्या प्रकारची अनपेक्षित वळणे वेग मंद न करता घेत काव्याच्या ह्या तंत्रात तरबेज असलेले मराठे घोड़े आणि घोडेस्वार शत्रूला बरोबर चुकवीत असत. आणि काव्याच्या लढाईमध्ये शत्रूची दिशाभूल हे प्रमुख उद्दिष्ट मराठा सैनिक साध्य करत असत. सर्वच बाबतीत वरचढ असलेल्या शत्रुपक्षाला पराजीत करण्यासाठी मराठ्यांनी हे युद्ध तंत्र वापरात आणले होते. अश्या वेगवान हल्यांमुळे शत्रुपक्षात मुसंडी मारत मराठा फ़ौज घुसे आणि शत्रु फळीमध्ये खिंडार पाडून लगेच परत फिरत असे. गोंधळलेल्या शत्रूच्या पिछाडीवर दुसरी तुकडी हल्ला करत असे आणि शत्रुला मागे फिरून मोहरा बदलवण्यास भाग पाडत असे. आता शत्रुच्या डाव्या-उजव्या बाजूवर हल्ले केले जात आणि शत्रूची पूर्ण फळी विस्कळीत केली जाई. याला 'Pincer Movement' असे म्हणतात.

मराठा पायदळ सुद्धा अश्याच तंत्राचा वापर करून शत्रूला हैराण करून सोडे आणि गुढगे टेकण्यास भाग पाडे. शत्रू बेसावध असताना अचानक हल्ला करणे आणि आपली सैन्यसंख्या कमी असून देखील ती जास्त आहे असे भासवणे असे विशिष्ट तंत्र वापरून शिवरायांनी सुरवातीच्या काळात शत्रुवर विजय प्राप्त केले. ह्या सर्वात 'वेग' हा मूलभूत महामंत्र आणि सोबत असते अखंड सावधानता.

पण गनिमी काव्याचे हे युद्ध खरच किती योग्य आहे??? प्राचीन भारतीय राजनीतीमध्ये कुठ-कुठली युद्धतंत्रे सांगितली गेली आहेत??? छत्रपति शिवरायांनी हे तंत्र वापरताना काय-काय विचार केला असेल??? ह्या सर्वांबद्दल आपण पुढच्या भागत थोड़ी माहिती घेऊ...
.
.
संदर्भ - शिवकालीन राजनिती आणि रणनिती (लेखक- श्री. रं. कुलकर्णी)

9 comments:

  1. अतिशय अप्रतिम माहिती. कावा या शब्दाचा हा म्हणजे खरा अर्थ अजिबात माहित नव्हता. आणि खुपच छान समजावलं आहेस. डोळ्यापुढे आलं सगळं !!

    ReplyDelete
  2. मलाही कावा या शब्दाचा अर्थ माहित नव्हता...धन्यवाद माहिती दिल्याबद्दल .

    ReplyDelete
  3. हेरंब आणि सागर ... ह्या युद्धतंत्राबद्दल अधिक माहिती पुढच्या भागात टाकतो. प्रतिक्रिया करता धन्यवाद...

    ReplyDelete
  4. अप्रतिम माहिती

    ReplyDelete
  5. सुरेख माहिती आहे .....

    ReplyDelete
  6. अप्रतिम माहिती बद्दल धन्यवाद!!!

    ReplyDelete
  7. Binary Bandya , तन्वी आणि मनमौजी आभार ... :)

    ReplyDelete