
किल्ल्याचा मुख्य दरवाजा हा कधीही दर्शनी नसे. त्यात गोमुखी बांधणीची दुर्गरचना असे. उदा. रायगड, सुधागड़, लोहगड हे किल्ले. दोन बुरुजांच्या कवेने चिंचोळ्या वाटेने आत गेले की दरवाजा समोर येत असे. ह्या ठिकाणी लढाईला फार जागा नसे व शत्रुवर वरुन चारही बाजूने तूटून पड़ता येत असे. जरी कोणी यातूनही आत शिरलाच, तरी पुढचा मार्ग सुकर नसे कारण महादरवाज्यातून आत शिरले की वाट ९० ते १८० अंशात डावीकड़े वळत असते. तिथून वाचून पुढे जाणे अगदीच अशक्य. शिवाय किल्ल्याचे १/३ चढण चढणे बाकी असते ते वेगळेच.

सागरी दुर्गबांधणीतही काही किल्ल्यांचे उल्लेख महत्त्वाचे आहेत. जंजिरेकर सिद्दीच्या उरावर शिवरायांनी पद्मदुर्ग उर्फ़ कांसा किल्ला बांधला. ह्याच्या तटबंदीच्या दगडाचे चिरे लाटा आदळून आदळून झिजले आहेत. पण त्यातला चुना मात्र अजून तसाच शाबूत आहे. सिंधूदुर्गाची कहाणी काय वर्णावी. सुरतेची १ कोट लुट वापरून सिंधूदुर्गाचा पाया मजबूत केला गेला. ५०० पाथरवट, २०० लोहार, १०० गोवेकर, ३००० मजूर अहोरात्र काम करायचे. ५ खंडी उकळते शिसे ओतून त्याचा पाया घडवला गेला. तर खांदेरीचा किल्ला सिद्दी आणि इंग्रज ह्यांच्या बरोबर मध्ये उभारला गेला. ह्या किल्ल्याच्या तटबंदीच्या बाहेर ओबड-धोबड़ दगडांच्या राशी आढळतात. भरतीच्या लाटा सोडाच पण साध होडक सुद्धा तटबंदीशी लगट करू शकत नाही. शिवाय त्या धारधार दगडांवर कोणी पाय ठेवायची हिम्मत सुद्धा करणार नाही.


सर्वोच्च दुर्गरचनाकार अस शिवरायांना म्हटले तर ते चुकीचे ठरणार नाही. अर्थात मोरोपंत पिंगळे, हीरोजी इंदुलकर, अर्जोजी यादव, यांच श्रेयही तितकच. साऱ्यानीच त्यांच कौशल्य पणाला लावले. त्यांनी स्थापत्यशास्त्राचे, दुर्गरचनेचे शिक्षण कोठून मिळवले, आराखडे कसे बनवले व इतक्या दुर्गम भागात बांधकाम केले तरी कसे? कोणास ठाउक.. पण एवढ मात्र नक्की की दुर्गबांधणीमध्ये त्यांनी निरनिराळे प्रयोग यशस्वी केले व त्यासाठी बारीक़-सारीक गोष्टींवर तपशीलवार विचार ही केले होते. एक दुर्गविज्ञान त्यांनी आपल्या समोर मांडून ठेवले आहे.
मन मातीत मिसळली की गवतांनाही भाले फुटतात, हे या मातीने आपल्याला शिकवले आहे. या बुलंद, बेलाग आणि बळकट किल्ल्यांवरती अशाच काही घटना घडल्यात. तेथे जायचे ते अश्याच सुवर्णक्षणांच्या आठवणीसाठी. पण सर्वात महत्वाचे म्हणजे त्यातून काहीतरी शिकवे आणि आपल्या दैनंदिन जीवनात त्याचा अवलंब करता आला तर पहावा...
(संदर्भ - अथातो दुर्गजिज्ञासा - प्र. के. घाणेकर.)