21 Feb 2009

भाग २ - वसई ते डहाणूचा इतिहास ... !




समकालीन राज्यकर्त्यांनी सागरी सामर्थ्य वाढवण्याकड़े आधीच लक्ष्य दिले असते तर हे न घडते. असा दृष्टिकोन बाळगणारे पहिले युगपुरुष म्हणजे हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपति शिवाजी महाराज. हा धोका वेळीच ओळखून त्यांनी १६५६ मध्ये कल्याण खाडीत दुर्गाडी किल्याच्या साक्षीने आरमाराची उभारणी सुरु केली. "जैसे ज्यास अश्वबल त्यांची पृथ्वी प्रजा आहे... तसेच ज्याजवळ आरमार त्याचा समुद्र... या करीता आरमार अवश्यमेव करावे." अशी भूमिका मांडणाऱ्या व त्यावर वाटचाल करणाऱ्या श्री शिवछत्रपति महाराजांची दूरदृष्टि थक्क करून सोडते. इंग्रजी इतिहासकारांनी लिहून ठेवल आहे 'बरे झाले हा शिवाजी डोंगरी मूलखात जन्मला.. जर हा सागरकिनारी जन्मता तर आमच काही खरे नव्हते' पुढच्या १२५ वर्षात ह्या मराठा आरमाराने उत्तुंग भरारी घेतली आणि परकिय सत्तांना दाखवुन दिले की हा सागर, ही जमीन आमची आहे. या ठिकाणी सत्ता करणे दूर; पण व्यापारासाठी सुद्धा आमची परवानगी घ्यावी लागेल आणि जबर कर ही द्यावे लागतील. सरखेल कान्होजी आंग्र्यांच्या काळात तर इथल्या लाटासुद्धा दस्तका खेरीज किनार्‍यावर आपटताना विचार करू लागल्या. छत्रपती शिवरायांच्या आरमाराने बरेच क्षेत्र कवेत घेतले होते. त्यांच्या पश्चात छत्रपती श्री संभाजी महाराजांनी पोर्तुगीज़ विरोधी धोरण पुढे रेटत गोवा आणि वसई या दोन्ही ठिकाणी हल्ले चढवले. यात १६८३ साली तारापूर आणि आसपासचा परिसर यांचा उल्लेख येतो. तसेच डहाणू आणि सायवन या गावांवर देखील हल्ले केल्याचा उल्लेख आढळतो.



पण उत्तर कोकणातून फिरंगणाचा समूळ नाश व्हायला १७३९ साल उजाडावे लागले. इतिहास प्रसिद्ध वसई मोहिमेने ते पार पाडले. श्री शिवछत्रपतिंच्या स्वराज्य कल्पनेच्या विस्ताराचे श्रेय थोरले बाजीराव पेशवे आणि नरवीर चिमाजी आप्पा यांना जाते. थोरले बाजीराव पेशवे यांनी प्रथमच नर्मदेपल्याड जाउन दिल्लीला पहिला तडाखा दिला. तर चिमाजी आप्पा यांनी फिरंगणाच उच्चाटन केल. या मोहिमेमध्ये मराठे उत्तरेकडून गंभीरगड़, डहाणू, तारापुर, शिरगांव, केळवे-माहिम, अर्नाळा जिंकत आले तर दक्षिणेहून चौल, रेवदंडा, बेलापूर, पारसिक, ठाणे, घोड़बंदर जिंकत वसई किल्ल्यावर निकराचा हल्ला चढवला गेला. त्याच जोडीला अशेरीगड़, कोहोज, तांदूळवाडी, टकमकगड़, काळदुर्ग हे सारे किल्ले सुद्धा आपण जिंकुन घेतले होते. ४ वर्षे सुरु असलेल्या मोहिमेचा शेवट वसई जिंकून साजरा केला गेला.



पण आज या सर्व किल्ल्यांची अवस्था बिकट आहे. आजही ऊनपाउस वारावादळाशी लढण्यास ते कटिबद्ध आहेत. आज येथे त्यांची यशोगाथा सांगणारे कोणी नाही. त्यांची हिच जिद्द, चिकाटी आणि प्रेरणा आपल्याला घ्यायला हवी. तिथल्या निरव शांततेत त्यांना आपण विचारल तर ...



डोंगरांनो का उभे? सांगाल का काही मला?
तीनशे वर्षांचिया जो मागला तो मामला... !
कुणी फिरस्ता हिंडता वनी...
वदला ऐसी आर्तवाणी... !
ऐकून त्याची आर्तयाचना...
आली येथल्या जडा चेतना... !
मला विचारा मीच सांगतो... !
आधी या माझ्या कड़े... !
सरसावत एकेक पुढे...
हात उभारुनी घुमू लागले... !
डोंगर किल्ले बुरुज कड़े...
डोंगर किल्ले बुरुज कड़े... !


(संदर्भ - जलदुर्गांच्या सहवासात - प्र. के. घाणेकर.)

2 comments:

  1. awesome!!! majhya shubhechcha aahet tumchya mage!! khup changale karya karat aahat!!!
    -abhi

    ReplyDelete
  2. रोहन दादा
    वाचतोय..
    नवीन माहिती मिळतेय .

    ReplyDelete