25 Feb 2009

भाग १ - दुर्गबांधणीचे शास्त्र ... !



इतिहास हा खर तर सर्वात जास्त उपेक्षित विषय पण आपला इतिहास हा सह्याद्रीच्या भुगोलाशी निगडित आहे. इथल्या दुर्गम दुर्गांशी आणि प्राचीन संस्कृतीशी आहे. इथे गड़ - किल्ले - दुर्ग, प्राचीन मंदिरे, शिलालेख, लेणी आणि ह्या सर्वांची रचना इतकी वैविध्यपूर्ण आहे.


"किती कोट किल्ले उभारुनि छाती..
कथा सांगताती अजुनी जुनी.. "

महाराष्ट्रातल्या बहुसंख्य किल्ल्यांचा संबंध छत्रपति शिवाजी महाराजांशी जोडला जातो. शिवकाळात 'संपूर्ण राज्याचे सार ते दुर्ग' हा विचार प्रकर्षाने जाणवतो. सातवाहन, राष्टकूट, शिलाहार, बहमनी, मोगल आणि प्रोतुगिज़ यांचा दुर्गबांधणी मधला सहभाग दुर्लक्ष करण्याजोगा नाही. पण शिवकाळ हा किल्ल्यांची उभारणी व त्यांचा उपयोग यांचा सुवर्णकाळ होता. दुर्गबांधणीतल्या तंत्राचा परमोच्च अविष्कार शिवदुर्गरचनेत आढळतो. त्यांनी काही जलदुर्ग उभारले तर काही गिरिदुर्ग, काही वनदुर्ग तर काही अश्मदुर्ग.


शिवछत्रपति महाराजांनी राजाभिषेकानंतर रघुनाथपंतांकडून 'राज्यव्यवहारकोश' तयार करवून घेतला. त्यात ७ वे प्रकरण किल्ल्यांवर आहे. तर रामचन्द्रपंत अमात्य यांच्या आज्ञापत्रात ८ व्या प्रकरणात किल्ल्यांचे महत्त्व, त्यांची रचना व व्यवस्था यावर उहापोह केला आहे. त्यात म्हटले आहे की "गड़कोट हेच राज्य, गड़कोट म्हणजे राज्याचे मुळ, गड़कोट म्हणजे खजिना, गड़कोट म्हणजे सैन्याचे बळ, गड़कोट म्हणजे राज्यलक्ष्मी, गड़कोट म्हणजे आपली वसतिस्थळे, गड़कोट म्हणजे सुखनिद्रागार किंवा गड़कोट म्हणजे आपले प्राणसंरक्षण."




पुढे किल्ल्यांच्या रचनेवर लिहिल आहे, "दरवाजे बांधावे ते खालील मारा चुकवून, पुढे बुरुज देउन. येतिजाती मार्ग बुरुजांचे आहारी पडोन दरवाजे बांधावे. किल्ल्यास एक दरवाजा थोर अयब आहे. याकरता गड़ पाहून एक, दोन, तीन दरवाजे तशाच चोरदिंड्या करून ठेवाव्या. त्यामध्ये हमेशा राबत्यास पाहिजे तितक्या ठेवून, वरकड दरवाजे आणि दिंडया चिणून टाकाव्यात."



ग़डावर येणारे मार्ग सुद्धा तितकेच महत्त्वाचे असायचे. त्याबदल लिहिले आहे, "ग़डावर यावयाचे मार्ग असतील ते सुगम नसावेत. सुगम असले तर ते मार्ग मोडून त्यावर झाडी वाढवून आणखीकड़े परके फ़ौजेस येता कठिण असे मार्ग घालावे. ग़डाची राखण म्हणजे कलारग्याची झाडी (डोंगर उतारावरची झाडी) प्रयत्ने वाढवावी. त्यामध्ये एक काठीही तोड़ो न द्यावी. बलकुबलीस (अडचणीच्या वेळी) झाडीमध्ये हशम बंदूके घालावी, या कारणेजोगे असो द्यावे."

ग़डाच्या स्वच्छतेबद्दल अत्यंत काटेकोरपणा पाळला जायचा, "ग़डावरी मार्गामार्गावरी बाजारात, तटोतट केर-करपट किमपिं पडो न द्यावे. ताकिद करून झाला केर ग़डाखाली न टाकता जागोजागी जाळून ती राखही परसात टाकून घरोघर होइल ते भाजीपाले करावे." त्याशिवाय झाडे कशी राखावी याबाबतीतही विस्त्रुत वर्णन आहे. वनखाते आजही वृक्षसंवर्धनासाठी शिवरायांचे आज्ञापत्र वापरते हे त्याचे वैशिष्ट्य.


प्रत्येक किल्ला व त्यासभोवतालचा प्रदेश हा शिवरायांच्या राज्यमालिकेतला एक घटकावयव होता. त्यांनी बहुतेक अचाट कृत्ये ह्या किल्ल्यांच्या सहाय्याने तडिस नेली. मिळवलेला बहुसंख्य पैसा नविन किल्ल्यांची बांधणी व पुर्नरचना यावर खर्च झाला. स्वतः शिवरायांनी किल्ल्यांचे महत्त्व खालील शब्दात वर्णन केले आहे. "जैसे कुळबी शेतास माळा घालून शेत राखितो, तसे किल्ले राज्यास रक्षण आहेत. तारवांस खीळे मारून बळकट करितात तशी राज्यास बळकटी किल्यांची आहे. किल्ल्यांच्या योगाने औरंगशहासारख्याची उमर गुजरून जाईल. आपणास धर्मस्थापना व राज्यसंपादन करणे होय. सर्वांस अन्न लावून, शत्रुप्रवेश न होय ते किल्ल्यांमुळे होते. सर्वांचा निर्वाह आणि दिल्लींद्रासारखा शत्रू उरावर आहे. तो आला तरी नवे-जुने तीनशेसाठ किल्ले हजरतीस आहेत. एक-एक किल्ला वर्ष-वर्ष लढला, तरी तीनशेसाठ वर्षे पाहिजेत." आणि पुढच्या पन्नास वर्षात सह्याद्रीने तेच अनुभवले.


१८ व्या शतकात मराठ्यांचा इतिहासावर पहिला शोध ग्रंथ लिहिणारा ग्रँट डफ म्हणतो, "किल्ल्यातून आत बाहेर कोणी केंव्हा जाणे, गस्ती फिरणे, चौक्या सांभाळणे व त्यावर देखरेख करणे, पाणी, धान्यसामुग्री व युध्दसामुग्री इत्यादी तयार ठेवणे यागोष्टीं वरती अगदी सक्तीचे सुक्ष्मनियम शिवाजीने केलेले असून प्रमुख शाखेवरील मुख्य अधिकाऱ्याची बारीक कामेसुद्धा ठरवलेली होती आणि ते नियम मोडण्यास तीळभर सुद्धा जागा नव्हती. इतके असून त्याचा ह्या बाबींचा खर्च फारच काटकसरीने बांधलेला होता."


तर डग्लस म्हणतो, "शिवाजीचे वास्तव्य डोंगरी मुलुखातच होते व त्याचे सामर्थ्य डोंगरी प्रदेशाच्या भरवश्यावरच होते. तो ख़राखुरा दुर्गस्वामी होता. त्याचा जन्म दुर्गात झाला. त्याला जे वैभव प्राप्त झाले ते दुर्गांच्यामुळे आणि त्याच्या दुर्गान्ना जे सामर्थ्य प्राप्त झाले तेही त्याच्याच प्रयत्नाने झाले. त्याचे दुर्ग म्हणजे भारतातील त्याच्या शत्रूंना धाक होता. त्याच्या राष्ट्राची ती संवर्धनभूमी होती. त्याच्या विजयाचा तो पाया होता. त्याच्या वाढत्या महत्वाकांक्षेचा तो जिना होता. दुर्ग हेच त्याचे निवासस्थान व तेच त्याच्या आनंदाचे निधान होते. कित्येक दुर्ग त्याने स्वतः बांधले आणि जे आधी बांधलेले होते, त्यासर्वांना त्याने बळकटी आणली."


क्रमशः ...


(संदर्भ - अथातो दुर्गजिज्ञासा - प्र. के. घाणेकर.)

1 comment: