20 Feb 2009

भाग १ - वसई ते डहाणूचा इतिहास ... !

महाराष्ट्र हा दुर्ग व लेणी यांचा देश आहे. या देशी आहेत तितके विविध आणि वैशिष्ट्यपूर्ण दुर्ग कोठेही नाहीत. सिंधूसागर आणि सह्याद्री ही या देशीची दोन आभुषणे. प्राचीन काळापासून सातवाहन, वाकाटक, चालुक्य, राष्ट्रकुट, शिलाहार, यादव यांच्यासारख्या समृद्ध आणि संपन्न राजघराण्यानी या प्रदेशात राज्य केले. अनेक दुर्गम दुर्ग त्यांनी उभारले. काही सागरी तर काही डोंगरी, काही भुईकोट तर काही घाटमाथ्यावर. या किल्ल्यांनी येथील राज्याच्या, प्रजेच्या आणि व्यापाराच्या समृद्धी मध्ये फार मोठे योगदान दिले आहे. वसई ते डहाणू ह्या भागात १३व्या शतकात नाथाराव सिंदा भोंगळे याचे राज्य होते. वसई किल्ल्याच्या जागी सर्वात आधी यानेच चार बुरुजांचा किल्ला बांधला. पुढे गुजरातच्या सुलतानाशी झालेल्या लढाईमध्ये हार पत्करुन त्याने वसई - तारापुर ते डहाणू हा भाग सुलतानाला सोपवला. बराच काळ मुस्लिम अधिपत्याखाली राहून सुद्धा ह्याभागात बहु संख्या प्रजा हिंदूच होती. बिंबराजा सोबत येउन येथेच स्थायिक झालेले सोमवंशी क्षत्रिय हे येथले मुख्य रहिवाशी.

पुढे १६व्या शतकात धर्म प्रसाराच्या उद्देशाने आलेल्या पोर्तुगिझांनी ह्या भागावर ताबा मिळवला. वसई ते डहाणू भागात त्यांनी अनेक किल्ले उभे केले. समकाळात दख्खनेवर मुस्लिम सत्तांची आक्रमणे सुरूच होती. १३व्या शतकात खिलजीने यादवांचे देवगिरीयेथील राज्य बुडवले. तर १४व्या शतकात विजयनगर साम्राज्य नष्ट झाले. नंतरच्या बहमनी, मुघल आणि इतर पातशहांनी महाराष्ट्रातील प्रजेवर अनेक जुलुम अत्याचार केले. युरोपातून आलेल्या इंग्रज, पोर्तुगिझ, फ्रेंच आणि अफ्रिकेमधल्या हबशी सिद्दी यांनी महाराष्ट्राच्या किनाऱ्यावर आपले हातपाय पसरले होते. यात सर्वात पुढे होते ते पोर्तुगिझ. त्यांनी बांधलेल्या सागरी किल्ल्यांचे अवशेष आज सुद्धा ठाणे जिल्ह्यामध्ये पाहता येतात. वसई ते डहाणू आणि पुढे ठाणे-घोड़बंदर ते बेलापुर अशी ३०हून अधिक जलदुर्गांची मालिका त्यांनी तयार केली होती. त्यात वसईचा किल्ला सर्वश्रेष्ठ. ऐन खाडीच्या मुखावर बांधलेला, ११० एकर पसरलेला आणि १० भक्कम बुरुज असणारा असा हा किल्ला. तर केळवे-माहिम भागातल्या १७ किल्ल्यांच्या बांधकामाची साखळी ही आगळी-वेगळी गोष्ट पहायला मिळते. आज मध्यवर्ती जेल म्हणुन वापरात असलेला ठाण्याच्या किल्ला पोर्तुगिझांनी मराठ्यांच्या हालचाली पाहून १७३०-१७३४ मध्ये ४ वर्षात २२ एकर जागेवर बांधून पूर्ण केला. वसई किल्ल्या खालोखाल ठाणे आणि अर्नाळा किल्ल्यान्ना महत्त्व होते. या शिवाय ठाणे, वसई, भाईंदर, वैतरणा या खाड़यावर त्यांचेच वर्चस्व होते. आसपास असणाऱ्या अशेरीगड़, कोहोज, तांदूळवाडी, टकमकगड़, काळदुर्ग, गंभीरगड़ या किल्ल्यांवर सुद्धा त्यांनी ठाणी बसवली होती. या जोरावर त्यांनी धर्मप्रसार केला. हिंदूंची देवळे फोडली. धर्म बाटवले. सातासमुद्रापारहून आलेले हे धर्मांध राक्षस २०० वर्षे स्थानिकांचा मनमुराद छळ करत होते. वसई किल्ला पाहताना त्यांच्या विलासीपणाचे, भव्यतेचे, कलाप्रियतेचे दर्शन घडते खरे. तरी सुद्धा त्यामागची हिंसकता, अमानुषता दडत नाही. ह्या साऱ्या वास्तू गरिब, निष्पाप, निरपराध हिंदूंच्या रक्तामासाच्या चीखलात बसवलेले चीरे आहेत हे स्पष्ट जाणवते.

दैवी संपत्तिचे पतनसुद्धा उर्ज्वस्वल असते हे रायगडावरील अवशेष सांगतात... तर आसुरी संपत्तिचे पतन घृणास्पद हे वसई किल्ल्याचे अवशेष सांगतात... !


क्रमशः ...

(संदर्भ - जलदुर्गांच्या सहवासात - प्र. के. घाणेकर.)

1 comment:

  1. "दैवी संपत्तिचे पतनसुद्धा उर्ज्वस्वल असते हे रायगडावरील अवशेष सांगतात... तर आसुरी संपत्तिचे पतन घृणास्पद हे वसई किल्ल्याचे अवशेष सांगतात... !"

    खरय

    ReplyDelete