14 Mar 2009

भाग ३ - छत्रपति शिवराय ... पत्ररूप व्यक्तिदर्शन ... !



आत्तापर्यंत गेल्या २ भागात आपण विविध प्रकारची पत्रे पाहिली. या भागात छत्रपति शिवरायांनी लिहिलेल्या काही राजकीय पत्रांवरुन त्यांचे व्यक्तिमत्व समजून घेण्याचा पर्यंत आपण करणार आहोत.


संदर्भ - 'छत्रपति शिवाजी महाराज ... पत्ररूप व्यक्तिदर्शन' - डॉक्टर रामदास.



२१) इंग्लंडच्या राजाने १६ जानेवारी १६६८ रोजी शिवाजी महाराजांना पत्र लिहून ईस्ट इंडिया कंपनीला व्यापारासाठी परवानगी दयावी म्हणुन विनंती केली. उत्तरादाखल २ ऑगस्ट १६६८ रोजी महाराजांनी जे पत्र आपल्या वकिलामार्फ़त इंग्लंडच्या राजाला पाठवले त्यात त्यांचा मुत्सद्दीपणा आणि जागरूकता दिसून येते. राजे म्हणतात,"दगाबाजी केलियास दोस्ती राहणार नाही आणि कंपनिस ताकीद करावी की व्यापाराशिवाय दुसरे कामात शिरू नये."



*****************************************************************************************************************************************************************

२२) आग्रा येथून सुटून आल्यावर १९ नोव. १६६७ रोजी शिवरायांनी पोर्तुगीजांविरुद्ध बारदेश येथे स्वारी केली. त्या भागातले काही वतनदार राजांना शरण आले तर काही पोर्तुगीजांकड़े पळून गेले. डिचोली येथील काही देसाई जे राजांना शरण आले होते त्यांना खालील कौलनाम्याने राजांनी वतन विषयक आश्वासन दिले. त्यात "देसाई मलसणवे यास त्याच्या हरामखोरी बद्दल योग्य ते शासन मिळेल" असे स्पष्ट लिहिले आहे.



*****************************************************************************************************************************************************************

२३) मुकुंद कान्हो देशपांडे याच्या कामामध्ये बाबाजी राम देशपांडे अडथळे आणत असे. हे कळल्यावर राजांनी त्याला २७ डिसेंबर १६६८ रोजी खरमरीत पत्र लिहिले. राजे म्हणतात,"नवे खलेल सर्वथा न करणे ....... ते काही चालणार नाही."



*****************************************************************************************************************************************************************

२४) "आदिलशाही प्रदेशावर स्वाऱ्या करा व आपल्या हक्काची अंमलबजावणी करून घ्या, आम्ही तुम्हास अवश्य पाठिंबा देऊ" असे आश्वासन शिवाजी महाराजांनी दत्ताजी केशवजी पिसाळ या आपल्या वाई येथील देशमुखास दिले आहे. २३ जुलै १६६९ रोजी लिहीलेल्या या पत्राने केशवजी शत्रुविरुद्ध अधिक उद्युक्त झाला आणि स्वराज्याच्या विस्तारास राजांच्या या धोरणाचा चांगलाच उपयोग झाला.




*****************************************************************************************************************************************************************

२५) चेउल सुभ्यामधले वतनदार, देशमुख आणि देशपांडे त्या भागाच्या सुभेदारीचे काम नीट चालू देत नसत. "उत्तम सुभेदार पाठवला असतानाही तुम्ही त्याच्याशी नसते वाद घालता आणि सुभेदारीचे काम होऊ देत नाही हे चालणार नाही. तुम्ही त्या सुभेदाराचा निर्णय मान्य करा व तसे न केल्यास तुम्हाला शासन होइल. काही मुलाहिजा होणार नाही" असे राजांनी १५ नोवेंबर १६७१ रोजी लिहिलेल्या पत्रात रोखठोकपणे म्हटले आहे.




*****************************************************************************************************************************************************************



२६) शिवाजी महाराजांनी मुरुड-जंजिरा समोर कांसा उर्फ़ पद्मदुर्ग उभा करून सिद्दीला थेट आवाहन दिले होते. त्या जलदुर्गाचे काम लवकरात लवकर व्हावे म्हणुन प्रभावळीचा सुभेदार जिवाजी विनायक याला आरमारास रसद पोचवायचे काम दिले होते. या कामात हयगय केल्याबद्दल शिवरायांनी १८ जानेवारी १६७५ रोजी जिवाजी विनायक याला कडक शब्दात ताकिद देणारे पत्र लिहिले.


त्यात ते म्हणतात,"ब्राह्मण म्हणुन कोण मुलाहिजा धरु पाहतो?" पुढे राजे म्हणतात,"या उपरी बोभाट आलिया उपरी तुमचा मुलाहिजा करणार नाही, गनिमाचे चाकर गनीम जालेस ऐसे जाणून बरा नतिजा तुम्हाला पावेल. ताकीद असे."




*****************************************************************************************************************************************************************

२७) शिवाजी महाराजांना न कळवता हवालदार शामजी आवजी याने सूर्याजी दूँदुसकर याच्या घरी मोकलदार बसवले. तेंव्हा राजांनी शामजी आवजी याला १ जून १६७५ रोजी "ज्याचा चाकर तोच येथे चाकराचा धनी आहे" असे ताकिद देणारे पत्र पाठवले.



*****************************************************************************************************************************************************************


२८) सासवड जवळ असलेल्या सुपे खुर्द गावची पाटिलकी निळकंठराव, काटकर व धनगर यांच्याकडे होती. असे असताना सुद्धा त्या भागाचे सुभेदार राघो बल्लाळ यांनी रामोजी व खंडोजी जगताप यांच्या सांगण्यावरुन धनगराची माणसे कैदेत टाकली आणि सांगून सुद्धा सोडली नाहीत. "हा कोण इंसाफ? तुम्हास हा अन्याय कोणी करावयास सांगितला होता?" असा जाब शिवरायांनी राघो बल्लाळ याच्याकडे ६ मार्च १६७६ च्या पत्रात मागितला आहे.



*****************************************************************************************************************************************************************

No comments:

Post a Comment