19 May 2009

भाग २४ - छत्रपति शिवराय ... पत्ररूप व्यक्तिदर्शन ... !

संदर्भ - 'छत्रपति शिवाजी महाराज ... पत्ररूप व्यक्तिदर्शन' - डॉक्टर रामदास.
(पत्ररूप व्यक्तिदर्शन ह्या मालिकेमधले हे शेवटचे पत्र)
४९) छत्रपति शिवाजी महाराजांनी एप्रिल १६६५ मध्ये मुघल सेनापती मिर्झाराजा जयसिंह याला लिहिलेले अत्यंत महत्त्वाचे असे पत्र ...

१६६० ते १६६४ पर्यंत अफझलखानाचा वध, पन्हाळ्याहून सुटका, शाहिस्तेखानावर लालमहालात हल्ला, मराठा आरमार उभे करून आणि अखेर सूरत बेसूरत करून शिवरायांनी मुघलांना त्राही-त्राही करून सोडले होते. आता औरंगजेबाने त्याचा सर्वात ताकदवर सेनापती मिर्झाराजा जयसिंह याला दख्खन मोहिमेवर पाठवले. त्याच्या सोबत होता दिलेरखान. शिवाजीराजांनी ह्यावेळी मिर्झाराजा जयसिंह याला लिहीलेले पत्र प्रसिद्ध आहे. या पत्रामधून तत्कालीन परिस्थितीचे आणि शिवरायांच्या मन:स्थितीचे यथार्थ चित्रण झाले आहे. हे पूर्ण पत्र वाचावे असेच आहे.

पत्रामध्ये राजे म्हणतात,"तुर्काचा जवाब तुर्कितच दिला पाहिजे."
स्वराज्य निर्मितीसोबत त्याचे संरक्षण करण्यासाठी प्रसंगी आक्रमकांशी युद्ध खेळण्यास जागृक राहणे याची पूर्ण जाणीव त्यांना होती. ह्या पत्रातून त्यांचा आत्मविश्वास आणि निर्धार दिसून येतो.

*****************************************************************************************************************************************************************

16 May 2009

भाग २३ - छत्रपति शिवराय ... पत्ररूप व्यक्तिदर्शन ... !


संदर्भ - 'छत्रपति शिवाजी महाराज ... पत्ररूप व्यक्तिदर्शन' - डॉक्टर रामदास.

४८) छत्रपति शिवाजी महाराजांनी जाने-फेब. १६८० मध्ये व्यंकोजीराजे भोसले यांना लिहिलेले चौथे आणि अंतिम अत्यंत महत्त्वाचे असे पत्र ...

१६७९ च्या शेवट-शेवटला मुघल फौजेने दिलेरखानच्या नेतृत्वाखाली उरल्या-सुरल्या विजापुरला वेढा टाकला होता. विजापुरचा मसूदखान याने विजापुर रक्षावे अशी गळ शिवाजीराजांना घातली तेंव्हा महाराजांनी फौजे सकट जालना - बागलाण - खानदेश अश्या मुघली प्रदेशात स्वारी व लुटालुट चालवली. ह्यामुळे दिलेरखानास विजापूरचा वेढा उठवून स्वतःच्या प्रदेशाच्या रक्षणासाठी येण्यास भाग कसे पडले याचे विवेचन राजांनी पुढील पत्रात केले आहे.

पत्रात राजे म्हणतात,"विजापूरचे अरिष्ट दूर करून विजापूर रक्षिले." खालील पत्रामधून राजांचे रणकौशल्य आणि 'बेरीरगिरी' उर्फ़ फिरत्या लढाईमधली निपुणता लक्ष्यात येते.

*****************************************************************************************************************************************************************

13 May 2009

भाग २२ - छत्रपति शिवराय ... पत्ररूप व्यक्तिदर्शन ... !


संदर्भ - 'छत्रपति शिवाजी महाराज ... पत्ररूप व्यक्तिदर्शन' - डॉक्टर रामदास.

४७) छत्रपति शिवाजी महाराजांनी १६७८-७९ मध्ये व्यंकोजीराजे भोसले यांना लिहिलेले तिसरे अत्यंत महत्त्वाचे असे पत्र ...

छत्रपति शिवाजी महाराजांनी व्यंकोजी भोसले यांस "गृहकलह बरा नव्हे" असे उपदेशात्मक पत्र लिहून त्यांना समजावण्याचा प्रयत्न केला होता. त्यानंतर ते शिवाजी महाराजांना येउन भेटले देखील. पण शिवाजीराजे आपले संपूर्ण राज्यचं हिसकावून घेतील या भीतीने त्यांनी रात्रीच छावणीमधून पळ काढला. आता मात्र शिवाजीराजांनी सर्वत्र मोर्चे बांधले आणि व्यंकोजीची पूर्ण जहागीर ताब्यात घेतली. तंजावर तेवढे मुद्दामून जिंकायचे बाकी सोडले.

'दक्षिण दिग्विजय मोहिम' आटोपून राजे परत रायगडी आले तेंव्हा त्यांना रघुनाथपंत यांसकडून कळले की, ह्या सर्वाने व्यंकोजी भोसले खचून गेले होते आणि त्यांनी वैराग्य धरायच्या गोष्टी सुरु केल्या होत्या. हे कळाल्यावर राजांनी त्यांस पुन्हा पत्र पाठवले.

पत्रात राजे म्हणतात,"कार्य प्रयोजनाचे दिवस हे आहेती" शहाजी राजांचे आणि स्वतःचे (शिवरायांचे) उदाहरण डोळ्यासमोर ठेवून काही पुरुषार्थ आणि कीर्ति मिळवावी असा कळकळीचा सल्ला छत्रपति शिवाजी महाराजांनी व्यंकोजी भोसले यांस ह्या पत्रात दिला आहे.



*****************************************************************************************************************************************************************

11 May 2009

भाग २१ - छत्रपति शिवराय ... पत्ररूप व्यक्तिदर्शन ... !


संदर्भ - 'छत्रपति शिवाजी महाराज ... पत्ररूप व्यक्तिदर्शन' - डॉक्टर रामदास.

४६) छत्रपति शिवाजी महाराजांनी १६७७ मध्ये व्यंकोजीराजे भोसले यांना लिहिलेले दुसरे अत्यंत महत्त्वाचे असे पत्र ...

"माहाराजाचे पोटी जाहालियाचे सार्थक केले ऐसे होईल" या आशयाचे पत्र त्यांना शिवाजी राजांनी लिहून सुद्धा व्यंकोजीवर काही परिणाम झाला नाही. व्यंकोजी उलट महाराजांशी फटकून वागला आणि एवढेच नव्हे तर त्याने मराठ्यांच्या फौजेवरच हल्ला केला. अर्थात तो फसला आणि त्यात त्याचा पूर्ण पराभव झाला.

छत्रपति शिवाजी महाराजांनी त्यांस पुन्हा उपदेशात्मक पत्र लिहून त्यांना समजावण्याचा प्रयत्न केला. ह्या पत्रात राजे म्हणतात,"गृहकलह बरा नव्हे." पुढे ते म्हणतात,"ऐकाल तर बरे. तुम्हीच सुखी पावाल. नाईकाल तरी तुम्हीच कष्टी व्हाल. आमचे काय चालते." ह्या नंतर मात्र व्यंकोजी भोसले शिवाजी महाराजांना येउन भेटले.



*****************************************************************************************************************************************************************

9 May 2009

भाग २० - छत्रपति शिवराय ... पत्ररूप व्यक्तिदर्शन ... !


संदर्भ - 'छत्रपति शिवाजी महाराज ... पत्ररूप व्यक्तिदर्शन' - डॉक्टर रामदास.

४५) छत्रपति शिवाजी महाराजांनी १६७६ मध्ये व्यंकोजीराजे भोसले यांना लिहिलेले अत्यंत महत्त्वाचे असे पत्र ...


राजाभिषेकानंतर छत्रपति शिवाजी महाराजांनी 'दक्षिण दिग्विजय' मोहिम आखली. गोवळकोंडयाच्या कुतुबशाही बरोबर सख्य करून विजापुरच्या आदिलशाहीचा नाश करायचा हे या मोहिमे मागचे सूत्र होते. १६७६-१६७७ ह्या २ वर्षात आदिलशाही बरीच खिळखिळी करण्यात राजे यशस्वी देखील झाले. याशिवाय तंजावर येथे त्यांचे सावत्र बंधू व्यंकोजीराजे भोसले राज्य करत होते. त्यांनी स्वराज्य विस्ताराच्या कार्यात आपल्या सोबत यावे असे शिवरायांना वाटत होते.


छत्रपति शिवरायांनी १६७६ मध्ये "माहाराजाचे पोटी जाहालियाचे सार्थक केले ऐसे होईल" या आशयाचे पत्र लिहून त्यांना काही सल्ले दिले. पत्रात राजे म्हणतात,"आपला वाटा तुजजवळ मागावा त्या कामाचा हा कागद नव्हे."


'दक्षिणेमध्ये खवासखानाचा भाऊ नासरखानावर हल्ला करून जिंजी ताब्यात घ्यावी, बहलोलखानाचा हस्तक शेरखान याला मारून त्याचा मुलुख जिंकावा, असे राजकारणी सल्ले राजांनी व्यंकोजीला या पत्रात दिले आहेत.'


शहाजीराजांचा पूत्र म्हणुन राजांनी पश्चिम महाराष्ट्रामध्ये राज्य कसे निर्माण केले आणि मग १६७३ नंतर पन्हाळा, फोंडा आणि सातारा घेउन दक्षिणेकड़े कूच केले आणि विजापुरला कसे पराभूत केले ह्याचे सविस्तार वर्णन यापत्रात त्यांनी लिहिले आहे.




*****************************************************************************************************************************************************************


7 May 2009

भाग १९ - छत्रपति शिवराय ... पत्ररूप व्यक्तिदर्शन ... !

संदर्भ - 'छत्रपति शिवाजी महाराज ... पत्ररूप व्यक्तिदर्शन' - डॉक्टर रामदास.



४४) छत्रपति शिवाजी महाराजांनी १६७० मध्ये आंबेजोगाईचे दासोपंत यांना लिहिलेले पत्र ...


मुघल सैन्य नेहमीच मठ आणि इतर धार्मिक स्थळाला नुकसान पोचवत असत. स्वराज्याची फौज मात्र त्याला अपवाद होती. जेंव्हा दासोपंत यांनी राजांना पत्र लिहून 'आम्हास फौजेचा उपद्रव होऊ नये' असे कळवले तेंव्हा राजांनी त्यांस पत्र पाठवले.

पत्रात राजे म्हणतात,"आपले गाव आहेति तिकडे आमचे लोक येणार नाहीत."



*****************************************************************************************************************************************************************

4 May 2009

भाग १८ - छत्रपति शिवराय ... पत्ररूप व्यक्तिदर्शन ... !

संदर्भ - 'छत्रपति शिवाजी महाराज ... पत्ररूप व्यक्तिदर्शन' - डॉक्टर रामदास.

४३) छत्रपति शिवाजी महाराजांनी २ सप्टेम्बर १६६० रोजी देशमुख कान्होजी जेधें नाईक लिहिलेले पत्र ...


शहाजीराजांच्या काळापासून स्वराज्यकार्यात हातभार लावणारे देशमुख कान्होजी जेधें नाईक काही कारणाने आजारी पडले. त्यांनी स्वतःच्या जिविताची आशा सोडली. आपले देशमुखीचे वतन महाराजांनी आपल्या मुलांकड़े न चालवले तर त्यांचे कसे होईल ही चिंता त्यांना होती. तशी चिंता त्यांनी राजांना पत्र लिहून कळवली.

पत्रास उत्तर देताना राजे म्हणतात,"तरी आता नवे लिहिणे काय लागले. पहिलेच पासून तुम्हा आम्हात घरोबा आहे." ह्यापत्रात शिवरायांना कान्होजींबद्दल किती आस्था आणि प्रेम होते ते दिसून येते.



*****************************************************************************************************************************************************************

3 May 2009

भाग १७ - छत्रपति शिवराय ... पत्ररूप व्यक्तिदर्शन ... !

संदर्भ - 'छत्रपति शिवाजी महाराज ... पत्ररूप व्यक्तिदर्शन' - डॉक्टर रामदास.

४२) छत्रपति शिवाजी महाराजांनी १६५७ मध्ये पूणे परगण्यामधले देशमुख बापाजी आणि विठोजी सितोळे यांना लिहिलेले पत्र ...
पूणे परगण्यामधले देशमुख बापाजी आणि विठोजी सितोळे यांनी मुघलांच्या धामधूमीमुळे कर भरण्यास असमर्थ आहोत, त्यात काही सूट मिळावी असे शिवरायांना पत्र लिहून कळवले. उत्तरादाखल लिहीलेल्या पत्रात त्यांची विनंती मान्य करताना राजे म्हणतात," दस्त माफीक ईनामति खडनीचा वसूल घेतील."



*****************************************************************************************************************************************************************