31 Dec 2010

ब्राह्मण म्हणुन कोण मुलाहिजा धरु पाहतो ?

पण सध्या ह्या ओळींचा दुरुपयोग करून शिवाजी महाराज ब्राह्मण विरोधी होते असा आरडा ओरडा केला जातोय. जर ते ब्राह्मण विरोधी असते तर त्यांनी त्यांच्या अष्टप्रधानात आणि कार्यात ब्राह्मणांना स्थान दिले असते का? स्वतः:ची वाक्ये राजांच्या तोंडात कोंबून ब्रिगेडी लोक अप्रत्यक्षपणे नव्हे तर आता थेट प्रत्यक्षपणे राजांचा अपमान करीत आहेत... जे लोक राजांबरोबर फक्त राजकारणात नाही तर युद्धात देखील खांद्याला खांदा लावून लढले त्यांच्याविरुद्ध हा मुर्खासारखा अपप्रचार सुरू केला आहे. हे थेट राजांच्या राज्यकार्याचा आणि युद्धनितीचा अपमानच आहे. ह्याचा निषेध करावा तितका कमीच.

'शिवाजी राजांचे खरे शत्रू कोण?' हे पुस्तक जेंव्हा माझ्या वाचनात आले तेंव्हा त्यावरील मुखपृष्ठ (शिवाजीराजे कृष्णाजी भास्करला मारताना) आणि 'ब्राह्मण म्हणुन कोण मुलाहिजा धरु पाहतो' या खालील ओळींनी विचारचक्र सुरू केले. राजांनी हे एका पत्रात लिहिले आहे खरे पण ते कृष्णाजी भास्करला नव्हे. कुठल्याही एका जातीची मक्तेदारी समाजावर नसून हे श्रींचे राज्य अशी धारणा राजांची होती. हे वाक्य राजांनी ज्या पत्रात वापरले आहे ते संपूर्ण पत्र मी येथे देत आहे. ह्यावरून समजून येईल की चुकीचे वाक्य चुकीच्या ठिकाणी वापरून लोकांची कशी दिशाभूल केली जात आहे...

शिवाजी महाराजांनी मुरुड-जंजिरा समोर कांसा उर्फ़ पद्मदुर्ग उभा करून सिद्दीला थेट आवाहन दिले होते. त्या जलदुर्गाचे काम लवकरात लवकर व्हावे म्हणुन प्रभावळीचा सुभेदार जिवाजी विनायक याला आरमारास रसद पोचवायचे काम दिले होते. या कामात हयगय केल्याबद्दल शिवरायांनी १८ जानेवारी १६७५ रोजी जिवाजी विनायक याला कडक शब्दात ताकिद देणारे पत्र लिहिले. त्यात ते म्हणतात,"ब्राह्मण म्हणुन कोण मुलाहिजा धरु पाहतो?"


********************************************************************************

मशहुरुल हजरत राजश्री जिवाजी विनायक सुभेदार व कारकून सुभे मामले प्रभावळी प्रती राजश्री शिवाजी राजे दंडवत. सुहुरसन खमस सबैर व अलफ. दौलतखान व दरिया सारंग यांसी ऐवज व गल्ला राजश्री मोरोपंत पेशवे यांणी वराता सुभे मजकुरावरी दिधल्या. त्यांस तुम्ही काही पावविले नाही म्हणोन कळो आले. त्यावरून अजब वाटले की ऐसे नादान थोडे असतील! तुम्हास समजले असेल की याला ऐवज कोठेतरी देवविला पाहिजे. तो न पावविता ऐवज खजाना रसद पाठीविलीया माजरा होईल म्हणत असाल. तरी पद्मदुर्ग वसवून राजपुरीच्या उरावर दुसरी राजपुरी केली आहे. त्याची मदत व्हावी. पाणी फाटी आदि करून सामान पावावे. या कामास आरमार बेगीने पावावे. ते होत नाही तर पद्मदुर्ग हबशी फौजा चौफेर जेर करीत असतील. आणि तुम्ही ऐवज न पाठवून आरमार खोळंबून पाडाल. एवढी हरामखोरी तुम्ही कराल आणि रसद पाठवून मजरा करू म्हणाल. त्यावरी साहेब (शिवाजी राजे) रीझतील की काय? ही गोष्ट घडायची तरी होय, न काळे की हबशियांनी काही देऊन आपले चाकर तुम्हास केले असतील! त्याकरिता ऐसी बुद्धी केली असेल! तरी ऐश्या चाकरास ठिकेठिक केली पाहिजेत. ब्राह्मण म्हणुन कोण मुलाहिजा धरु पाहतो? या उपरी त्याला ऐवज व गल्ला राजश्री मोरोपंत देविला असे तो देवितील. तो खजाना रसद पाविलीयाहून अधिक तेणेप्रमाणे आदा करणे की जे तुमची फिर्याद न करीत व त्यांचे पोटास पावून आरमार घेऊन पद्मदुर्गाच्या मदतीस राहात ते करणे. या उपरी बोभाट आलिया उपरी तुमचा मुलाहिजा करणार नाही, गनिमाचे चाकर गनीम जालेस ऐसे जाणून बरा नतिजा तुम्हाला पावेल. ताकीद असे.

रवाना छ २ जिल्काद.

********************************************************************************
तर हे १८ जानेवारी १६७५ रोजी लिहिलेले पत्र १६ वर्षे आधी घडलेल्या 'कृष्णाजी भास्कर' बरोबर जोडून अपप्रचार आणि गैरसमज पसरविला जात आहे... हे आपण अधिकाधिक लोकांपर्यंत पोचवणार आहोत का???

30 Dec 2010

सर्व ज्ञातीने कस्त करून शत्रु पराभवाते न्यावा...

सर्व ज्ञातीने कस्त करून शत्रु पराभवाते न्यावा...

होय दोस्तांनो... हे खुद्द आपल्या महाराजांनी म्हटले आहे... छत्रपति शिवरायांनी २८ जानेवारी १६७७ रोजी सामान्य रयतेस उद्देशून लिहिलेले पत्र समाजातील प्रत्येक व्यक्तीला आजही लागू पडते. आपापल्या आचारधर्माचे पालन करावे, सर्वांनी एकदिल होउन शत्रुचा पराभव करावा असे आवाहन त्यांनी ह्या पत्रात केले आहे. सध्या सर्वत्र जे सुरू आहे ते बघता आपण त्यांची आज्ञा आजही पाळणार आहोत का?




*******************************************************************************

स्वस्ति श्री राज्याभिषेक शके ३ नल नाम संवत्सरे माघ शुद्ध ५ क्षत्रिय कुलावत्वंस श्री राजा शिवाजी छत्रपती स्वामी यांणी समस्त ब्राह्मण वेदपाठी व ग्रहस्थान व क्षत्रिय मंडळी तथा प्रभू ग्रह्स्थान व वैश्यजाती व शुद्रादी लोकान तथा जमेदार व वतनदार व रयेत वगैरे सर्व जाती हिंदू महाराष्ट्रान तथा महालांनी (सुभा) व देश व तालुके व प्रांतानिहाय वगैरे यास आज्ञा केली ऐसीजे.

हिंदू जातीत अनादी परंपरागत धर्मशास्त्राप्रमाणे धर्म चालत आले असता अलीकडे काही दिवसात येवनी अंमल जाहल्यामुळे काही जातीतील लोकांस बलात्कारे धरून भ्रष्ट केले व कित्येक जागीची दैवते जबरीने छीन्न-भिन्न केली. हिंदू जातीत हाहाकार जाहला. गाय ब्राह्मणसह धर्म उच्छल होण्याचा समय प्राप्त जाहला.त्याजवरून श्रीईश्वरी कृपेने आमचेहोत श्री शिवाजीने यवन वगैरे दृष्टास शासन करवून पराभवाते नेले व राहिले ते शत्रू पादाक्रांत होतील.


परंतु लिहिण्याचे कारण की या सरकारात राज्याभिषेक समयी क्षेत्रक्षेत्रादि क्षेत्रस्थ ब्राह्मण बहुत ग्रंथ अनादी सर्व जमा करून धर्म स्थापना जाहली. त्यास श्रीकाशी क्षेत्ररथ ब्राह्मणात काही तट पडून हाली ग्रंथ पाहता भटजीकडून तफावत झाली आहे असे ठरले. त्याजवरून हल्ली पुन्हा शास्त्रीपंडित व मुत्सद्दी व कारकून यास आज्ञा होऊन ज्ञाति विवेक व स्कंद पुराणांतर्गत श्याद्रीग्रंथ ((सह्याद्रीग्रंथ?) आदी महानग्रंथी निर्णय सर्व झातीविशी जाहले आहेत ते वगैरे सर्व ग्रंथानुमते व जसे ज्याचे धर्म अनादी चालत आले त्याप्रमाणे निरवेध चालावे आगर ज्या ज्या ज्ञातीस वेदकर्मास अधिकार असून येवनी जाहल्यामुळे अथवा ब्राह्मणांनी काही द्वेषबुद्धीने शास्त्रानुरूप काही कर्मे न चालविता मलीन झाली असतील ती त्या ज्ञातीच्या मंडळींनी पुरी पाहून ज्याची त्याची नीट वहिवाट आचाराने. ज्या ज्ञातीत जशी परंपरा चालत आली ती त्याप्रमाणे चालविणे. जो कोणी द्रवे लोभास्तव ब्राह्मण शास्त्रविरहित नवीन तंटे करून खलेल करील येविसो त्याज्ञाती यानिवाले सरकारात अर्ज करावा म्हणजे शास्त्राचे समते व रूढीपरंपरा व ग्रंथ पाहून  निरंतर निरमत्छ्रपणे धर्मस्थापना कोणाचा उजूर न धरिता पर्निष्ट जेंव्हाचे तेंव्हाच त्वरित बंदोबस्त होईल.


हल्ली यवन उत्तर देशीहून येत आहे. तरी सर्व ज्ञातिने एकदिल राहून कस्त मेहनत करून सेवा करून शत्रू पराभावाते न्यावा. यात कल्याण तुमचे सरकारचे ईश्वर करील. जाणेजे.

*******************************************************************************


सध्या महाराष्ट्रात जाणीवपूर्वक सुरू असलेल्या घाणेरड्या आणि जातीविषयक इतिहास बदलाचा मी निषेध करत आहे. जे लोक हे करत आहेत त्यांना समजत नाही आहे की प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे ते थेट शिवरायांचा अपमान करीत आहेत...


"जे जे होईल ते ते पाहावे.. हे कैसे ऐसे आयुष्य जाहले..."